Total Pageviews

Monday, June 23, 2014

एवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं....

खरंतर वाचायला काहीच नाहीये. पण, तरीही ते कोरे कागदही वाचून संपत नाहीयेत.
कुठेही पोहोचलो नाहीयेय, वाट संपत नाहीये. पण, वाटेतलं अंतर कापणंही मी सोडलं नाहीये
खरंतर विझणं कधीचच अनुभवलंय मी. पण, तरी जळणं काही सुटत नाहीये.गर्दी माणसांची आहे, पण मी त्यात नाहीये. मग, एकटाच माणूस गोंगाट कसा करू शकतो?
इथे कुणीही दुसरं नाहीये. मग काचेत दिसतंय ते कोण आहे? तो हसतो, तो रडतो, हसत हसत रडतो अन रडत रडत हसतो.
सोबत असलेली माणसं पटत नसतात आणि पटत असलेली माणसं सोबत नसतात, यालाच 'नरक' म्हणतात बहुतेक.
आपण एखाद्या गोष्टीमागे जीव तोडून धावत जातो, पाठलाग करतो आणि आपण पाठ फिरवून निघून जाताना मागे वळून पहिल्यावर आपला पाठलाग मात्र कुणीच नाहीये याची जाणीव टोचणारी असते.यालाच 'तुच्छ' म्हणतात बहुतेक.
कितीतरी बोलत रहावे, मनात असेल नसेल सगळं बडबडत रहावं आणि थोड्या वेळाने लक्षात यावं की, आजूबाजूला कुणीच नाहीये. या जाणीवेला 'भकासपणा' म्हणतात बहुतेक.
स्वतःची किंकाळी स्वतःच ऐकण्याएवढं जगात दुसरं भयंकर काहीही नसतं.

No comments: