Total Pageviews

Sunday, June 3, 2012

सॅंडविच

सॅंडविच
Saturday, February 07th, 2009 AT 1:02 PM

खरं म्हणजे माझं आणि बायकोचं पटत नाही, असं अजिबात नाही. कुठल्याच विषयात आमचे टोकाचे मतभेद नाहीत; पण तिचं माझ्या आई-वडिलांशी जमत नाही. मग ती मला सारखं त्यांच्यावरून टोकत असते. मुलं त्यांच्याकडे गेली तरी मोठा वाद होतो. एखादा निर्णय मी आई-वडिलांना विचारून घेतलाय, असं नुसतं वाटलं तरी तो तिनं फिरवलाच म्हणून समजा. आता आता तर तिनं सांगायलाच सुरवात केली आहे, "एक तर मी नाही तर ते'. हे एक सोडलं तर ती चांगली शिकलेली आहे, नोकरी करते. घर, मुलंसुद्धा नीट बघते. माझ्याविषयी तिला आकस आहे, असं नाही; पण सतत आई-वडिलांशी वाद आणि त्यांच्याशी संबंध सोडायची भाषा.
"दुसरीकडे म्हणाल, तर मी एकुलता एक मुलगा. आई-वडील म्हणतात, की तुझं लग्न केलं आणि तू पार बदललास. त्यांचं आणि माझ्या बायकोचं अजिबातच जमत नाही. आईचा आणि तिचा तर छत्तीसचा आकडा. आईच्या मते तिला शिस्त नाही, पद्धत नाही, आमच्या घरात ती एकरूपच झालेली नाही. तर हिच्या मते माझी आई संसारात फारच ढवळाढवळ करते. थोडक्‍यात काय, तर मी दोन्ही बाजूंनी फटके खातो.'"तसं पाहिलं तर आई-वडिलांनी खस्ता खाऊन माझं शिक्षण पूर्ण केलंय. माझ्या कॉलेजच्या मोठाल्या फी भरल्यात. आता लग्न झालंय म्हणून आई-वडिलांना तोडून टाकावं, हे मला मान्य नाही. तसंच बायकोलाही आई-वडिलांशी जमत नाही एवढ्या कारणानं मी दूर करू शकत नाही.'
""म्हणजे चांगलाच समजूतदार आहेस की तू.'' मी म्हणालो. ""अहो, पण उपयोग काय त्याचा? थोडक्‍यात सांगायचं तर माझं "सॅंडविच' झालंय. सगळ्यात वाईट म्हणजे माझ्यावर दोघंही नाखूष. बायको म्हणते, की एवढं आई-वडिलांचं ऐकायचं होतं तर लग्नच करायचं नव्हतं. आई वडील म्हणतात, की तू इतका बावळट आणि बायकोच्या आहारी जाणारा निघशील असं वाटलं नव्हतं. आता मी तरी काय करू? मला तर वाटतं, की सगळ्यांनाच सोडून द्यावं किंवा आपणच कुठंतरी पळून जावं, कारण कोणीच माघार घ्यायला तयार नाही.'
""अरे, पण हा काही त्यावरचा उपाय नाही.'' मी त्याला कसंबसं समजावलं; पण त्याची स्थिती दया येण्याजोगी होती, हे मानायलाच पाहिजे. काही ठिकाणी मुलगा "खमक्‍या' असल्याने तो आई-वडील आणि बायको दोघांनाही आपापल्या ठिकाणी ठेवतो. मात्र काही मुलं या वादात प्रचंड चिंतेत पडतात. त्यांना दोघांचंही पटतं आणि मग नक्की काय करावं, हे कळत नाही. तिसरा प्रकार फारच वेगळा असतो. ते लोक आई-वडील आणि बायको यांच्या वादाचा आणि आपला काहीही संबंध नाही, असं जाहीर करून स्वतः सुखी होतात; पण सरहद्दीवरच्या चकमकी मात्र जोरात चालूच राहतात.
अर्थात हा काही सर्वसामान्य नियम नाही किंवा वादाचं एकमेव कारण नाही. अनेक ठिकाणी सुनेला मुलीप्रमाणे आणि सासू-सासऱ्यांना आपल्या आई-वडिलांप्रमाणे वागवलं जातं. पण जिथं असं घडत नाही तिथं मात्र मुलगा हवालदिल होतो. दोन्ही बाजूंकडून मुलावर हक्क प्रस्थापित करण्याच्या नादात वाद वाढत जातात. अशा स्थितीत मार्ग कसा काढावा, या चिंतेत मुलगा पडतो.हा विषय वर्षानुवर्षं चर्चिला जात आहे. याला अनेक पैलूही आहेत. फक्त व्यवसायात दिसणारा हा एक वादाचा मुद्दा. मात्र कुटुंबं छोटी झाल्याने तो गंभीर बनला आहे. या अशा वादात खरा तोटा, ज्याच्याशी कोणाचाच वाद नाही, अशा मुलांचाच होतो. दोघांचाही हेतू त्या मुलाचं हित व्हावं, हाच असतो. पण मग दोन्ही बाजूंनीही समजूतदारपणा दाखवला आणि आपल्या वादात विनाकारण मुलाचा तोटा होतो आहे, याचा विचार केला, तर या "सॅंडविच'चा खप थोडा कमी होईल.
ऍड. अभय आपटे

No comments: