Total Pageviews

Saturday, August 20, 2016

पती-पत्नी

मॅरीड लोकांनी(च) वाचावा (च) असा लेख ...
( हा लेख माझा नव्हे )

गिरिजा व प्रसाद मुंबईला सकाळी एक्‍स्प्रेसने निघाले. निघण्यापूर्वी त्यांनी घरी न्याहारी केली. गिरिजा ही पित्तप्रधान व प्रसाद हा कफप्रधान प्रकृतीचा होता. पित्तप्रधान प्रकृतीमुळे गिरिजाचा जठराग्नी प्रदीप्त होता. दोन तासांतच तिला भूक लागली. कर्जतला गिरिजाने वडापाव मागितला. प्रसादला भूक नसल्याने त्याने गिरिजाला वडापाव घेऊन दिला. नंतर दादरजवळ गिरिजाने सॅंडविच खाण्याची इच्छा व्यक्त केली. प्रसाद म्हणाला, ‘‘आपण सकाळी बरोबरच न्याहारी केली. तू नंतर वडापाव खाल्लास. आता परत सॅंडवीच मागतेस. तोंडावर जरा बंधन घाल.’’ आपल्या खाण्यावर टीका केल्याने गिरिजाला राग आला व वाद होऊन दिवस खराब गेला. प्रसादला हे कळलं असतं, की पित्तप्रधान प्रकृतीच्या लोकांचं अन्नपचन लवकर होतं, त्यांना वारंवार भूक लागते; तर वाद झाला नसता.

सचिन व हेमा प्रेमळ जोडपं. सचिन वातप्रधान; तर हेमा कफप्रधान प्रकृतीची. कफप्रधान प्रकृतीचे लोक स्थूल असून, ते डुलत-डुलत चालतात. वातप्रधान प्रकृतीचे लोक वेगाने चालतात. सचिन हेमाच्या बरोबर चालताना भरकन पुढे जायचा, त्यामुळे ‘मी तुम्हाला शोभत नाही म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चालत नाही,’ असा गैरसमज करून हेमा वाद घालायची. वातप्रकृतीचे लोक जलद चालतात हे हेमाला ठाऊक असते, तर त्यांची भांडणे टळली असती.


स्त्रिया संपूर्ण दिवसात देहबोली व हावभाव धरून सुमारे २० हजार शब्द बोलतात; तर पुरुष सात हजार शब्द बोलतो. पुरुष दिवसभर घराबाहेर सात हजार शब्दांचा साठा संपवून घरी येतो. स्त्री दिवसभर घरीच असेल, तर तिचा शब्दसाठा शिल्लक असतो. शब्दसाठा संपल्यामुळे पतीची बोलायची इच्छा नसते. पत्नीला मात्र किती बोलू असं होतं. नवरा ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसल्यास त्याचं आपल्यावर प्रेमच नाही, असं तिला वाटतं व वातावरण बिघडायला सुरुवात होते. पुरुषाचा नैसर्गिक शब्दसाठा सात हजारच असतो, हे पत्नीला माहीत असतं, तर भांडण टळलं असतं. मागच्या पिढीपुढे ही समस्या नसायची. एकत्र कुटुंबात खूप माणसं, त्यामुळे स्त्रीचा २० हजार शब्दांचा साठा पुरा व्हायचा; पण आता मोबाईलवर बोलूनही व नवऱ्यानं प्रतिसाद न दिल्यानं तिचा हा शब्दांचा साठा पूर्ण होत नाही. ती निराश होते व बोलण्याची स्वाभाविक इच्छा पूर्ण न झाल्यानं संबंध बिनसतात.


पती-पत्नी एकमेकांवर अपेक्षांचं ओझं लादतात आणि आपल्या आवडीनिवडी, सवयी सारख्या असाव्यात, असा आग्रह धरतात. पण आपल्या साथीदाराला निसर्गनियमाला अनुसरून ‘स्पेस’ व स्वातंत्र्य द्यायला हवं. 


एकमेकांना समजून घ्यायला हवं. अहंकाराला तिलांजली देऊन जुळवून घेण्याची मानसिकता ठेवली, तर जीवनवेलीवरच्या फुलांना बहर येईल.

No comments: