Total Pageviews

Saturday, August 20, 2016

सांगकाम्या, हरकाम्या आणि अल्लादिन का चिराग

सांगकाम्या, हरकाम्या आणि अल्लादिन का चिराग

सांगकाम्या म्हणजे सांगीतलेले काम, सांगीतलेल्या पद्धतीने करणारी व्यक्ती, हरकाम्या म्हणजे हर एक काम करू शकणारी व्यक्ती, तर ‘अल्लादिन का चिराग’ म्हणजे सांगितलेले हर एक काम सांगितलेल्या पद्धतीने स्वस्त दरात करून देणारी व्यक्ती.

आता चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आले असेलच की ‘अल्लादिन का चिराग’ या प्रकारातील व्यक्ती अस्तित्वातच नसते. खर तर सांगकामे व हरकामे ह्याही व्यकी अस्तित्त्वात नसतात, त्यामुळे ‘अल्लादिन का चिराग असणे निवळ अशक्य.

पण गंमत अशी आहे की प्रत्येक उद्योजकाचे एक अव्यक्त व अगम्य असे स्वप्न असते की आपल्या पदरी ‘अल्लादिन का चिराग’ असावा. या ‘अल्लादिन का चिराग’ साठी All Rounder, हर हुन्नरी, हनुमान, Man Friday, उजवा हात, पु.ल. चा नारायण अशी नानाविध नावे प्रचलित आहेत.

आता ‘अल्लादिन का चिराग’ अस्तित्वातच नसल्याने उद्योजकाचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे ते एक मधला मार्ग निवडतात. आपल्या पदरी असलेल्या ‘चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्तीचे रुपांतर ‘अल्लादिन का चिराग’ मध्ये करावयाचा प्रयत्न करतात. पण अस्तित्वात नसलेली व्यक्ती निर्माण करण्याच्या या प्रयत्नात, सुरुवातीला यश जरी आले, तरी कालांतराने अपयश येते.


वारंवार ‘अल्लादिन का चिराग’ निर्माण करण्याच्या प्रयत्नात अपयश येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे वाढत जाणाऱ्या अपेक्षा. हाताशी धरलेल्या व्यक्तीमध्ये ‘चुणचुणीतपणा व आज्ञाधारकपणा’ असल्याने व सुरुवातीला अपेक्षा कमी असल्याने यश येते परंतु नंतर अजून जास्त, कमी वेळेत, कमी खर्चात कामे अधिक चांगली करून घेतली जाऊ शकतात ही भावना प्रबळ होते, त्यावर अंमल केला जातो आणि काल पर्यंतचा चुणचुणीत व आज्ञाधारक माणूस अचानक निस्तेज व बंडखोर बनतो किंवा तसा वाटू तरी लागतो.


या सर्व प्रकरणाची दुसरी एक बाजू अशी आहे की मुळातच उद्योजकास ‘अल्लादिन का चिराग’ पदरी असावे असे वाटते का? 


असे वाटण्याचे मला उमजलेले कारण म्हणजे आणखीन एका उद्योजकाकडे अशी व्यक्ती आहे असा झालेला गैरसमज व चुकूनमाकून झालीय तयार अशी व्यक्ती तर काय बहार येईल? हा विचार.....
वारंवार ‘अल्लादिन का चिराग’ निर्माण करत राहण्याचे तोटे म्हणजे चुणचुणीत व आज्ञाधारक व्यक्तींचे निस्तेज होणे, थिजून जाणे किंवा कालांतराने कंपनी बदलणे, उद्योजकांचे निराश होणे, चिडचिड करणे व पर्यायाने कंपनीत तणावग्रस्त वातावरण तयार होणे.


आता यावर उतारा काय? तर त्यांची पंचसुत्री पुढीलप्रमाणे...... 


1) मुळात नेहमी आपण सांगेल ते काम, सांगेल त्या पद्धतीने कमी खर्चात व कमी वेळेत करणारी व्यक्ती या भूतलावर अस्तित्वात नाही हे उद्योजकांने एकदा मान्य करावे.
2) आपले प्रत्येक काम, सांगेल त्या पद्धतीने, कमी खर्चात व कमी वेळेत नेहमी करणारी एखादी व्यक्ती अस्तित्वात नसली तरी, आपले एखादे काम, एकापेक्षा जास्त वेळा, कमी खर्चात व कमी वेळेत करून देणाऱ्या अनेक व्यक्ती आपल्या पदरी आहेत, हे लक्षात घ्यावे व समाधान मानावे.
3) आपल्या तोडांतून निघालेला प्रत्येक शब्द प्रत्यक्षात यावा असे वाटत असल्यास मुळात शब्द जपून व कमीतकमी बाहेर पडू दयावे.
4) एखाद्यास काम सांगताना दिसेल ‘त्यास, सुचेल ते’ असे न करता कामाच्या प्रकारानुसार व्यक्तीची निवड करावी, तसेच त्या व्यक्तीवर सध्या असलेला ‘कार्याचा बोजा’ समजून घ्यावा.
5) तोंडावर ‘हो’ म्हणून काम न करणारी व्यक्ती, ही काम जमणार नसेल तर तसे सांगणाऱ्या व्यक्तीपेक्षा जास्त घातक असते हे लक्षात घ्यावे.


अधिक काय लिहावे तुम्ही सुज्ञ आहातच.


रणधीर पटवर्धन
९८२२५२७१३२
rspatwardhan@gmail.com

No comments: