Total Pageviews

Wednesday, September 10, 2014

तर अजिबात प्रपोज करू नका....

..तर अजिबात प्रपोज करू नका
नात्यामध्ये तुम्ही कमिटेड होण्याच्या विचारात आहात का? त्यासाठी खालील कारणं महत्त्वाची मानत असाल, तर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात. त्यामुळे त्यांचा विचार करा आणि निर्णयावरही फेरविचार करा.
तो/ती छान आहे
तो किंवा ती छान आहे हे कारण कोणत्याही नात्यासाठी फुटकळ ठरणारं आहे. तुम्हाला शंभर 'छान' मुलं किंवा मुली मिळून जातील, त्यामुळे हे कारण गृहित धरू नका. नात्यात गुंतण्यासाठी कोणताही जोडीदार केवळ छान असणं महत्त्वाचं नसतं, तर त्याच्या स्वभावाचे प्रत्येक पैलू माहीत असावे लागतात. तिच्या किंवा त्याच्यापेक्षा चांगलं किंवा उत्तम शोधण्याचा प्रयत्न करा.
एकमेकांना खूप आधीपासून ओळखतो
तुम्ही पंधरा वर्षाचे होता, तेव्हापासून एकमेकांना ओळखता आणि आता २५ वर्षांचे झालात, तरी एकत्र आहात. हे कारण प्रपोज करण्यासाठी नक्कीच पुरेसं नाही. जास्त वेळ एकत्र आहात याचा अर्थ लग्न केलंच पाहिजे असा काही नियम नाही. नवरा-बायको बनण्याचा अट्टहास नको. त्याच्याबरोबर किंवा तिच्याबरोबर उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी तुम्ही खरोखरच इच्छुक आहात का किंवा तिच्या/त्याच्यासोबत एकत्र राहाण्यात तुम्हाला रस वाटतो का हे पाहा. तिच्या/ त्याच्याशिवाय राहाणं आता मुश्कील आहे अशी भावना असेल, तर प्रपोज करायला हरकत नाही.
माझ्या आईला तो/ती आवडते
आपल्या आईबाबांना ती/तो सून किंवा जावई म्हणून पटते. किंवा त्यांनी तसंच मानलंय, अशी कारणं असतील, तर प्रपोज करण्याचा विचारही मनात आणू नका. तुम्हाला त्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचंय, त्यामुळे आई-बाबांच्या भावनेपेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या.
तिचं/त्याचं कुटुंब एकदम मस्त आहे
कुटुंबासाठी नाही, तर स्वतःसाठी लग्न करा. अन्यथा तुमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या आल्यास नातं शेवटाला जाऊ शकतं. त्यामुळे कुटुंब मस्त आहे म्हणून ती व्यक्तीही छानच असेल असं नाही. मग हे कारण नकोच.
जवळीकता
मध्यंतरी शारीरिक जवळीकता आली होती आणि त्याचं ओझं मनावर आहे, हे कारण तसं संवेदनशील आहे; पण या कारणाला घाबरून किंवा लाजिरवाणं वाटून नात्यात बांधले जाऊ नका. संकुचित विचार न करता निर्णय घ्या.
तो/ती जास्त पैसे कमवते/कमवतो
पैसा हा सर्वस्व नाही. त्यामुळे त्याच्या हव्यासापोटी नात्यात बांधले जाऊ नका. पैशांमुळे सुखसोई येतात. सुख नाही, हे पक्कं लक्षात ठेवा. पैशापेक्षा प्रेम आणि आपुलकीच महत्त्वाची असते.
मित्रांच्या नादाने
तुम्ही तिशी पार केली आहे आणि या वयात तुमचे इतर मित्रमंडळी लग्नबंधनात अडकले आहेत, त्यांना मुलंबाळं झाली आहेत... पण तुमच्या बाबतीत मात्र अजून अफेअरचाही पत्ता नाही. मग तुम्ही निराश वगैरे झाला आहात. केवळ या नैराश्यापोटी कुणालातरी प्रपोज करण्याच्या विचारात असाल, तर चुकीच्या वाटेवर जात आहात. नात्याची घाई करू नका. अन्यथा लग्नानंतर समस्या निर्माण होतील आणि ते डोईजड होईल. नुसतंच लग्न करावंसं वाटतंय म्हणून कुणालातरी प्रपोज करून उपयोगाचं नाही. जर त्या व्यक्तीशी लग्न करावंसं वाटत असेल तर मात्र जरूर विचार करा.
तिचं/त्याचं प्रेम आहे म्हणून...
कमिटमेंटसाठी केवळ एकाचं प्रेम असून फायद्याचं नाही. दोघांचंही एकमेकांवर प्रेम असणं महत्त्वाचं आहे. नात्यात जबरदस्ती करून फायद्याचं नसतं हे लक्षात घ्या.
आमच्यातली मैत्री लई भारी
काहीजणांकडे मित्र किंवा मैत्रीण म्हणून आपण पाहू शकतो; पण ती व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य असेलच असं नाही.

मुंबई टाइम्स
Sep 10, 2014

No comments: